तुंबाडचे खोत श्री. ना. पेंडसे

तुंबाडचे खोत - जगबुडी नदीच्या च्या किनाऱ्यावर वसलेली खोत घराण्याची चार पिढ्यांची द्विखंडी कहाणी.





पेशवाईच्या उत्तरार्धा पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालखंडांत खोतांचा सगळा जीवनपट पुरा होतो.

या कादंबरीतील एकमेव भारावून टाकणारं व्यक्तिमत्व वाटलं मला ते म्हणजे - नरसु खोत.
क्षुद्र बुद्धीच्या लोकांना त्याने कधीच भाव दिला नाही. दिलदार माणूस, चुलत भावंडं नेहमी जळत, कुरघोडी करत राहिले त्यावर, तरी त्याने त्याकडे लक्ष दिला नाही, त्यांना तो अक्षरशः खेळवत राहिला. परंतु हीच लोकं संकटं आल्यावर नरसु कडे धाव घेत, आणि मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याने कधीच माघारी पाठवलं नाही. हा नरसु जगला त्यात शान होती!
परंतु आयुष्यात चढ-उतार असायचेच. अशा राजस प्रकृतीच्या माणसाला आयुष्याच्या उत्तरार्धात अपमान, चरित्र्यावरचे उडालेले शिंतोडे सहन करावे लागले. तरी त्याचा मृत्यू 'शान से' व्हायचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा तो काळ. नरसुने मामलेदार काचेरीवर काँग्रेस चा झेंडा फडकवला आणि घोषणा दिल्या - "इंग्रजानो चालते व्हा - छोडो हिंदुस्थान-" आणि पोलिसांनी आदेश दिला - "- फा - य - र - "
असा हा नरसू, आयुष्यभर यश मिळवत गेला आणि मृत्यूवर सुद्धा स्वार होऊन गेला.
लेखकाने रंगवलेल्या नरसू या characterकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या वाटल्या मला.

दुसऱ्या खंडात टिळकवाद-गांधीवाद-सावरकरवाद अशा स्वातंत्र्य पूर्व काळातल्या घटनेवर छान स्पष्टीकरणं मिळतात.

कादंबरीच्या आरंभी भाऊसाहेब नामक व्यक्ती आपण तुंबडच्या खोतांचे वंशज असल्याचे सांगून आपल्या घराण्याचा शोध घ्यायला येतात. खोत घराणं नामशेष होत आलेलं असताना, या घराण्याला जवळून पाहिलेले बाबल्याशेट त्यांना चार पिढ्यांची हकीकत सांगतात.
आणि कादंबरीच्या शेवटी भाऊसाहेबांना आपली तुंबाडची शाखा मिळते.

सूडाच्या भावनेने एका घराण्याचा झालेला कुलक्षय हा कादंबरीचा गाभा.
परंतु - 'कुलक्षय वगैरे कल्पना शेवटी भ्रमकच. माणूस स्वतःला उगाच उदास करून घेतो. ज्याला आरंभ आहे त्याला अंतही आहेच.'

Comments

Popular posts from this blog

गोफ - गौरी देशपांडे

एकेक पान गळावया - गौरी देशपांडे

भिन्न - कविता महाजन